Monday, February 20, 2017

छत्रपतींच्‍या स्‍वराज्‍यात शेतक-यांना मोठे पाठबळ होते....... प्रा. डॉ अशोक जोंधळे

शिवरायांच्‍या स्‍वराज्‍यात जिथे जि‍थे नापीक जमिनी होत्‍या, त्‍या पिकाऊ केल्‍या गेल्‍या. त्‍यांच्‍या स्‍वराज्‍यात नैसर्गिक आत्‍पतीमध्‍ये शेतसारा माफ केला जात असे, शेतक-यांना मोठे पाठबळ होते, असे प्रतिपादन ज्ञानोपासक महाविद्यालयाच्‍या हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रख्‍यात व्‍याख्‍याते प्रा. डॉ. अशोक जोंधळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍त दिनांक 18 फेब्रवारी रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते, व्‍यासपीठावर विभाग प्रमुख डॉ उद्य खोडके, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ राकेश आहिरे, विद्यार्थी प्रतिनिधी रवि सुरवसे, अमोल पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. अशोक जोंधळे पुढे म्‍हणाले की, शिवाजी राजे शेतक-यांना अर्थसहाय्य करणार शासनकर्ता होता. त्‍यांच्‍या राज्‍यात शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, नांगर, अवचारे आदीसाठी बिनव्‍याजी कर्ज दिल जात असे. छत्रपतीच्‍या विचारांचे आजच्‍या युवकांनी पुजन करावे, छत्रपती शिवाजी हे केवळ डोक्‍यावर घेऊन मिरवु नका तर डोक्‍यात घेऊन मिरवा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोप प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राकेश आहिरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी धीरज पवार व धंनजय भोसले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचलन डॉ पी के वाघमारे यांनी व आभार प्रदर्शन डॉ पी एच गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालतील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.