Thursday, February 11, 2016

मेक इन इंडिया मध्ये कृषि तंत्रज्ञानास मोठा वाव ........... माननीय राज्यपाल तथा कुलपती मा श्री चेन्नमेननी विद्यासागर राव

वनामकृवि राबवित असलेल्‍या उमेद व स्‍वच्‍छ भारत अभियानाची माननीय राज्‍यपालांनी केली पाहणी
मार्गदर्शन करतांना माननीय राज्यपाल  तथा कुलपती मा  मा श्री चेन्नमेननी विद्यासागर राव
कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना
मार्गदर्शन करतांना माननीय राज्यपाल  तथा कुलपती मा  मा श्री चेन्नमेननी विद्यासागर राव
वनामकृविच्या उमेद कार्यक्रमावर आधारीत प्रदर्शीनी दालनाची पाहणी करतांना
स्वच्छ भारत अभियानास हिरवा झेंडा दाखवितांना

देशातील शेती क्षेत्र हे एक महत्‍वाचे क्षेत्र असुन आजही शेती हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. पन्‍नास टक्‍के पेक्षा जास्‍त लोकसंख्‍या शेतीवर अवलंबुन आहे. सध्‍याचा काळ शेती क्षेत्रासाठी संक्रमणाचा काळ आहे. वातावरणातील बदल, सततचा दुष्‍काळ, वाढत चाललेले शहरीकरण हे राज्‍यातील शेती पुढील मुख्‍य संकटे आहेत. गत तीन वर्षापासुन दुष्‍काळ परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हतबल झाला आहे, त्‍यांच्‍यातील नैराश्‍य कमी करण्‍यासाठी विद्यापीठ राबवित असलेला उमेद जागृतीचा उपक्रम निश्चितच कौतुकास्‍पद आहे, असे प्रतिपादन माननीय राज्‍यपाल तथा कुलपती मा. श्री. चेन्‍नमेननी विद्यासागर राव यांनी केले.
       वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ राबवित असलेल्‍या उमेद व स्‍वच्‍छ भारत अभियानाची पाहणी दिनांक ११ फेब्रवारी रोजी माननीय राज्‍यपाल श्री. चेन्‍नमेननी विद्यासागर राव यांनी केली, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा. श्री. राजेश विटेकर, महापौर मा. श्रीमती संगिता वडकर, खासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, विभागीय आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट यांची प्रमुख उपस्थिती होती

   माननीय राज्‍यपाल पुढे म्‍हणाले की, वातावरण बदलास अनुकूल कृषि तंत्रज्ञान विकसीत करण्‍यावर कृषि विद्यापीठाने भर द्यावा. दुष्‍काळ परिस्थितीस तोंड देण्‍यासाठी वाटर बजेट, कुपनलिका व विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन, जलसंधारण आदि बाबींवर भर द्यावा लागेल. देशामध्‍ये फळ व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्‍पादन होते परंतु शेतमाल प्रक्रिया व साठवणुक सुविधांच्‍या अभावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यापीठांनी अन्‍नप्रक्रिया, पॅकीजिंग व शेतमालाचे मूल्‍यवर्धन करणारे तंत्रज्ञान विकसीत करावे व या क्षेत्रात कृषि उद्योजक घडवावेत. एका बाजुस मजुरांना रोजगार नाही तर शेतीमध्‍ये मजुरांची कमतरता आहे. अन्‍न सुरक्षा, जल सुरक्षा व उर्जा सुरक्षा या बाबींवर अधिक काम करण्‍याची गरज असुन ग्रामीण जीवनमान उंचवण्‍यासाठी कृषि शास्‍त्रज्ञ, शासन व शेतकरी यांना सामुदायीकरीत्या काम करावे लागेल.
   विद्यापीठ राबवित असलेला स्‍वच्‍छ भारत अभियान कार्यक्रम वाखण्‍याजोगा असुन महाविद्यालयीन युवकांनी यात मोठे योगदान दिले आहे. कृषि पदविधरांना कृषि व्‍यवसायात मोठी संधी असुन भारत सरकार राबवित असलेले स्‍टार्ट अप इंडिया मध्‍ये आपले नाविन्‍यपुर्ण कृषि तंत्रज्ञान व कल्‍पना सादर कराव्‍यात. मेक इन इंडियामध्‍ये कृषि तंत्रज्ञानाचा सुध्‍दा सहभाग होऊ शकतो. कृषि विद्यापीठाकडील नाविन्‍यपुर्ण व शेतक-यांना उपयुक्‍त तंत्रज्ञान मेक इन इंडियामध्‍ये मांडाव्‍यात, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. 

   या प्रसंगी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा. श्री. राजेश विटेकर यांनी परभणी जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात राबवित असलेल्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानाची माहिती दिली तर खासदार मा. श्री संजय जाधव यांनी मराठवाड्याच्‍या कृषि विकासासाठी समन्‍यायी पाणी वाटपाची गरज असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी कृषि विद्यापीठ राबवित असलेल्‍या उमेद व स्‍वच्‍छ भारत अभियान कार्यक्रमाची माहिती दिली. 

   कृषि विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञानावर व विविध उपक्रमावर आधारीत प्रदर्शनीची पाहणी माननीय राज्‍यापाल यांनी केली. कार्यक्रमात विद्यापीठ विकसित एकात्मिक किड व्‍यवस्‍थापनावरील मोबाईल अॅप चे माननीय राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले. विद्यापीठ रा‍बवित असलेल्‍या उमेद कार्यक्रमावर आधारीत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले प्रकाशित पुस्तिकेचे व स्‍वच्‍छ भारत अभियानावर आधारीत प्राचार्य डॉ डि एन गोखले संपादित गंध मातीचा, बंध समाजाचा’  पुस्तिकांचे विमोजन माननीय राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्र सैनिकांनी राबविलेल्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानाच्‍या क्षणचित्राची पाहणी माननीय राज्‍यपाल यांनी करून स्‍वच्‍छ भारत अभियानास हिरवा झेंडा दाखविला.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राचार्य विशाला पटणम यांनी केले. कार्यक्रमास जिल्‍हाधिकारी मा. श्री राहुल रंजन महिवाल, जिल्‍हा पोलीस अधिक्षीका श्रीमती नियती ठाकर, विद्यापीठ कार्यकारीणी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री रविंद्र देशमुख, मा. श्री अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे आदिसह प्रगतशील शेतकरी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्‍यापक, कर्मचारी व‍ विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

विद्यापीठ विकसित कुपनलिका पुनर्भरण मॉडेलची पाहणी करतांना माननीय राज्यपाल
उमेद पुस्तिकेचे विमोचन करतांना
गंध मातीच, बंध समाजाचा पुस्तिकेचे विमोचन करतांना
प्रास्ताविक करतांना कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
एकात्मिक किड व्यवस्थापनावरील मोबाईल अप चे विमोचन करतांना