Wednesday, March 11, 2015

शास्‍त्रज्ञांचे संशोधन कार्यच छंद झाला पाहिजे......... मृदाशास्‍त्रज्ञ मा. डॉ. पी. के. छोंकर

वनामकृवित कृषि व मृदा संशोधनातील नाविण्‍यपुर्ण क्षेत्र’’ विषयावरील व्‍याख्‍यानमालाचे उद्घाटन

वैज्ञानिक संशोधनात अतिउच्‍च ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी स्‍वप्रेरणा व कामाप्रती आवड पाहिजे, शास्‍त्रज्ञांचे संशोधन कार्यच छंद झाला पाहिजे, त्‍यातुन आनंद प्राप्‍त करता आला पाहिजे. कुटुंब, समाज, काम व छंद यात संतुलन साधता आले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्‍थेचे मृदाशास्‍त्रज्ञ मा डॉ. पी. के. छोंकर यांनी केले.
       वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग व भारतीय मृद विज्ञान संस्‍था शाखा परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि व मृदा संशोधनातील नाविण्‍यपुर्ण क्षेत्र’’ या विषयावर दि. १० ते १२ मार्च दरम्‍यान देशातील प्रमुख मृदाशास्‍त्राज्ञांच्‍या व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डी. एन. गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
       मा डॉ. पी. के. छोंकर पुढे म्‍हणाले की, आजच्‍या युवकांना भारतीय पोलीस सेवा व भारतीय प्रशासकीय सेवेचे आकर्षण आहे, कारण तेथे प्रतिष्‍ठा व पैसा आहे. पंरतु कोणत्‍याही क्षेत्रात ध्‍येय निश्चिती व इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर आपण प्रतिष्‍ठा व पैसा प्राप्‍त करू शकतो. संशोधनात यशस्‍वी होण्‍यासाठी आपले शारीरिक आरोग्‍य सुदृध व तणावरहित असणे, निरीक्षण व चिकित्‍सक बुध्‍दी तल्‍लख असणे आवश्‍यक आहे. चिकित्‍सक बुध्‍दीच्‍या जोरावर जगात अनेक शोध लागले आहेत. संशोधकास आपले विचार व भावना स्‍पष्‍टपणे मांडता आल्‍या पाहिजे. अलौकिक कल्‍पना ही वैयक्‍तीक बुध्‍दीचे उत्‍पादन असु शकते परंतु ती कल्‍पना प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी सामुदायीकरित्‍या प्रयत्‍न करावे लागतात. सामुदायीकरित्‍या काम करण्‍याची मानसिकता संशोधकांनी विकसीत केली पाहिजे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
       कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी हवामान बदल व त्‍याचा शेतीवरील परिणाम यावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, भारत हा क्षेत्रफळाने मोठा देश असुन हवामानात विविधता आहे. देशातील ६० टक्‍के शेती ही पर्जन्‍यमानावर अवलंबुन असुन शेती पध्दतीत विविधता आहे. हवामान बदलास नैसर्गिक व मनुष्‍य निर्मित दोन्‍ही बाबीं कारणेभुत असुन कार्बन डॉय ऑक्‍साईड, मिथेन, नॉट्रोजन ऑक्‍साईड इत्‍यादी हरितगृह वायुचा हवामानावर मोठा परिणाम होत आहे. हवामानात अचानक होणा-या बदलास तोंड देण्‍यासाठी मानवास कृती करण्‍यास अत्‍यंत कमी वेळ मिळतो, हीच मोठी अडचण शेतीमध्‍ये आहे.
       जागतिक तापमानात वाढ होत असुन गेल्‍या शंभर वर्षात ०.७४ डिग्रीसेंटीग्रेड सरासरी तापमान वाढ झाली आहे. गेल्‍या काही वर्षात तापमान वाढीचा दर वाढला आहे, याचे मुख्‍य कारण वातावरणातील प्रदुषण आहे. तापमान वाढीचा नकारत्‍मक परिणाम उष्‍ण कटिबंधातील शेतीवर जास्‍त होत आहे. भारतात हवामान बदलावर दृष्‍टीक्षेप टाकला तर हे लक्षात येते की, पावसाचे दिवस कमी झाले आहेत, गेल्‍या शंभर वर्षात उन्‍हाळयातील सरासरी तापमानात ०.६ डिग्री सेंटीग्रेडने वाढ झाली असुन सन २१०० पर्यंत हे तापमान ३.५ ते ५ डिग्री सेंटीग्रेडने वाढ होऊ शकते. तापमान वाढीमुळे भारतात पर्जन्‍यात तफावत येत असुन त्‍याचा परिणाम खरिप पीकावर होत असुन रब्‍बी हंगामात तापमानात वाढ होत आहे. एक डिग्रीसेंटीग्रेडने सरासरी तापमान वाढले तर देशातील गहु उत्‍पादनावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच सोयाबीन मध्‍ये तापमान वाढीमुळे शेंगा भरण्‍यावर परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे फलोत्‍पादनात किड व रोगाचा प्रार्दुभाव वाढला असुन किड व रोगाचा पुर्वानुमान शेतक-यांना देणे आवश्‍यक आहे. तापमान वाढीचा परिणाम दुग्‍ध उत्‍पादनावर ही होत असुन तापमान वाढीस प्रतिकारक जातीची निर्मितीवर भर दयावा लागेल.
       तापमान वाढीचा परिणाम देशाच्‍या अन्‍नसुरक्षततेवर ही होणार असुन ही बाब तात्‍काळ गांभीर्याने घेण्‍यासारखी आहे. अन्‍नसुरक्षतेसाठी मानवास हवामान बदलावर दोन बाजुने लढावे लागेल, एकतर हवामान बदलाला कारणेभुत असणा-या बाबी कमी कराव्‍या लागतील, यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्‍न होणे गरजेचे आहे तर बदलत असलेल्‍या हवामानास अनुकुल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. धोरणात्‍मक निर्णयात हवामानावर आधारित पीक विमा योजना राबवाव्‍या लागतील, राज्‍यस्‍तरीय हवामान बदल संशोधन केंद्र सुरू करावे लागेल, मातीतील कार्बनचे प्रमाण वाढीवर भर दयावा लागेल, नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व हवामान बदल याचा अभ्‍यासक्रमात समावेश करावा लागेल. शेतक-यांची खरी समस्‍या ओळखण्‍यासाठी शेतक-यांशी शास्‍त्रज्ञांना अधिकाधिक संवाद साधवा लागेल, तरच संशोधकाची बुध्‍दी अधिक प्रगल्‍भ होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
       कार्यक्रमात मान्‍यवर वक्‍त्‍यांचा परिचय संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी करून दिला तर प्रास्‍ताविक संयोजक तथा विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ हरिहर कौसडीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, शास्‍त्रज्ञ, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ महेश देशमुख, डॉ. अनिल धमक, डॉ गौतम हानवते, डॉ सुरेश वाईकर, डॉ सुदाम शिराळे, त्रिवेणी सांगळे, श्री अडकिणे व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.