Wednesday, January 28, 2015

सामाजिक दायीत्व म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ‍ता मोहिम हाती घ्यावी....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेची सांगता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. दि २८ जानेवारी रोजी वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहाच्‍या परिसरात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येऊन मोहीमेची सांगता करण्‍यात आली. आजच्‍या स्‍वच्‍छता कार्यक्रमाची सुरूवात कुलगुरू डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. याप्रसंगी मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, स्‍वच्‍छ भारत अभियांनातंर्गत गेल्‍या एक आठवडयापासुन विद्यापीठ परिसर स्‍वच्‍छतेत विद्यार्थ्‍यांनी मोठे योगदान दिले असुन सामाजिक दायीत्‍व म्‍हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी शहरातील मुख्‍य सार्वजनिक ठिकाणे जसे की रेल्‍वे स्‍टेशन, बसस्‍थानक, भाजीमार्केट आदी परिसर स्‍वच्‍छतेची मोहिम हाती घ्‍यावी.
   स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या सांगता कार्यक्रमाच्‍या अ‍ध्‍यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ बी आर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, जगात विविध क्षेत्रात देशाचे मोठे नाव आहे परंतु परिसर स्‍वच्‍छतेत आपण पिछाडीवर आहोत. देशात परिसर स्‍वच्‍छतेबाबत मोठा वाव असुन भविष्‍यात आपल्‍या परिसरात घाणच होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. छोटया छोटया गोष्‍टीतुनच आपण मोठे कार्य घडत असते. स्‍वच्‍छ शरीर, स्‍वच्‍छ परिसर तरच मनही स्‍वच्‍छ राहील, स्‍वच्‍छता ही विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हावा, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
   विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव म्‍हणाले की, स्‍वच्‍छतेची सुरूवात स्‍वत: पासुन करून ही मोहिम तळगाळापर्यंत पोहजली पाहिजे. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, गेल्‍या आठवडयापासुन विद्यापीठाचा परिसरात स्‍वच्‍छतेची मोहिम राबविली असुन सर्व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनीसह प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचा-यांनी यात मनापासुन योगदान दिले­. सर्वांनी या पुढेही महिन्‍यातुन एक दिवस श्रमदानासाठी देण्‍याचा संकल्‍प करावा.
  स्‍वच्‍छतेच्‍या मोहिमेमुळे विद्यापीठातील परिसराच्‍या प्रसन्‍नतेत वाढ झाली असुन याचा अनुकुल परिणाम आम्‍हास अभ्‍यासासाठी होईल, असे मत पदव्‍युत्‍तर विद्यार्थी सय्यद शेख यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, डॉ राकेश आहिरे, सहाय्यक वसतीगृह अधिक्षक डॉ जी के लोंढे, डॉ व्‍ही एस खंदारे, डॉ के डि नवगिरे, डॉ विशाल अवसरमल, राष्‍ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ आशिष बागडे व रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिल कांबळे यांच्‍यासह पदव्‍युत्‍तर विदयार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

स्‍वच्‍छ भारत अभियांनातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेचे सांगता कार्यक्रमात अध्‍यक्षीय भाषण करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ बाबासाहेब ठोंबरे आदी.